Total Pageviews

Wednesday, June 23, 2021

ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग - ३

                ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग - ३ 

       ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

               "एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या  समूहाने  दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि  ठराविक  समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन  म्हणजे   'ध्येय' किंवा  'लक्ष्य' असते."              

        या व्याख्येतील पहिल्या तीन अटींवर आपण मागील अंकात  चिंतन केले, आज उर्वरित ४ अटींवर आज विचार करूया -

        



        चौथी अट आहे ध्येय कधी पूर्ण व्हायला हवे ? उत्तर आहे ध्येय ठराविक समय सीमेत पूर्ण व्हायला हवे. ध्येय-निर्धारण करतांना,ते साध्य करण्याची वेळ ठरवणे अतिशय गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर ध्येय साध्य झाले तरी त्याचे महत्व उरत नाही, म्हणून वेळ ठरविणे अतिशय गरजेचे असते. व्यवसायात समय-सीमेला अत्यधिक महत्व असते, एखादे काम किंवा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाले नाही, तर नुकसान सुरू होते आणि ते जितक्या उशिरा पूर्ण होईल, तितके नुकसान अधिक होत जाते कारण आपण योजना आखतांना, त्यात मजूरी किती लागणार, आवश्यक उपकरणांचे भाडे किती लागणार, कर्ज घेतले असल्यास व्याज किती लागणार हे सर्व जोडून त्या प्रोजेक्टची किंमत ठरवतो. आता जर काही कारणांमुळे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नाही तरी मजूरी, भाडे, व्याज हे चालूच राहते व  त्यामुळे नुकसान व्हायला सुरुवात होते. वेळ किंवा समयसीमा ठरविली नाही तर आपण दिशाहीन भटकत राहतो, म्हणून ध्येय-निर्धारण करतांना ध्येय-पूर्तीची समय-सीमा ठरविणे अतिशय महत्वाचे आणि गरजेचे आहे.  

        पाचवी अट आहे - ध्येय निर्धारण कशासाठी  करावे ? उत्तर आहे अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी, यशाचे शिखर गाठण्यासाठी ध्येय निर्धारण करावे. अपेक्षित परिणाम मिळविणे किंवा यशाचे शिखर गाठणे म्हणजे नक्की काय असते? आपल्याला जीवनांत , व्यवसायात, नोकरीत आपल्याला कुठपर्यंत पोचायचे आहे, काय-काय मिळवायचे आहे? एखादे मोठे पद, मोटार , बंगला, फार्महाऊस, 6 आकडी मासिक पगार या सर्व सामान्य माणसांच्या ईच्छा असतात व हे त्याला मिळावे अशी त्याची अपेक्षा असते. या अपेक्षापूर्तीलाच अपेक्षित परिणाम मिळविणे किंवा यशाचे शिखर गाठणे म्हणतात. ह्या अपेक्षा तेव्हांच पूर्ण होतात जेव्हां आपण त्यांना ध्येय म्हणून ठरवतो आणि हे ध्येय तेव्हांच साध्य होते जेव्हां आपण  ते मिळविण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करतो.  ध्येय ठरविल्याने आपल्याला पुढचे पाऊल उचलण्यासाठी दिशा मिळते, म्हणून ध्येय ठरविणे अतिशय गरजेचे आहे. 

        अगदी सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा आपल्या घरी कुणाच्या लग्नाच्या तयारीला आपण कधी लागतो ? उत्तर आहे विवाह ठरल्यावर आपण त्याच्या तयारीला लागतो. लग्नाला जर एक 'ध्येय' मानल्यास, ते आधी ठरते, त्यानंतर तो विवाह सोहळा कधी, कुठे, कोणत्या पद्धतीने (आजकाल आंतरजातीय विवाह अधिक होत असल्याने हे देखील ठरवावे लागते), किती खर्चात, किती दिवसांचा होईल, त्यात कोण-कोण उपस्थित राहील, पाहुण्यांसाठी कोणत्या सोयी कराव्या लागतील या सर्व कामांना दिशा तेव्हांच मिळते जेव्हां ते ठरते ! लग्नाला जर 'ध्येय' म्हंटले तर हे ध्येय ठरविल्याने पुढील तयारीला दिशा मिळते आणि अपेक्षित परिणाम 'शुभ-विवाह' हे साध्य होते. 

       पुढील सहावी अट आहे- ध्येय-निर्धारण करतांना काय-काय करायचे असते ? उत्तर आहे चिंतन करणे, योजना आखणी करणे, रणनीती ठरवणे, मार्गात येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी विचार करणे, हे सर्व ध्येय-निर्धारण करतांना करायचे असते. 

    मागील दिलेल्या लग्नाच्या उदाहरणाने हे देखील समजून घेऊया. लग्न ठरले की त्याची समय सीमा (Deadline ) ठरते. मग विवाह-मुहूर्त (Deadline ) गाठण्यासाठी आपण कामांची यादी बनवतो व त्यांची प्राथमिकतेच्या  आधारावर  विभागणी करतो. सर्वात आधी आपण कार्यस्थळ, गुरुजी, वेडिंग प्लॅनर, कॅटरर ठरवतो. त्यानंतर पाहुण्यांची यादी, आमंत्रण-पत्रिका इतर कामे करतो, वर-वधू विविध  विधी करतांना कोणते कपडे घालणार,  कोणती आभूषणे घालणार, कोणत्या पाहुण्यांना कुठे थांबविणार, मेन्यू काय-काय असणार, हे सर्व ठरवतो व  त्याप्रमाणे खरेदी करतो, व्यवस्था करतो, बॅग भरतो म्हणजे थोडक्यात योजना आखणी करतो, रणनीती ठरवतो. रिसेप्शन किंवा लग्न गार्डन मध्ये होणार असले आणि पावसाळ्याच्या दिवसांत लग्न असेल तर आपण पाऊस  आल्यास किंवा उन्हाळ्यात असेल तर उन्हा पासून जपायसाठी वैकल्पिक व्यवस्था करून ठेवतो, म्हणजे आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी आधीच विचार करून ठेवतो. परिणामी आपल्या येथील विवाह-सोहळा निर्विघ्नपणे व यशस्वीरीत्या पार पडतो.
       


       ध्येय-निर्धारणासाठी शेवटली अट आहे - ध्येय-निर्धारण करतांना चिंतन कसे असावे ? उत्तर आहे, ध्येय-निर्धारण करतांना चिंतन 'प्रेरक' आणि 'सकारात्मक' असणे गरजेचे आहे. आपल्याला ध्येयाच्या दिशेने प्रवृत्त  करण्यासाठी सकारात्मक आणि प्रेरक चिंतन 'उत्प्रेरका' प्रमाणे काम करते आणि आपली ध्येयाच्या दिशेने  चालण्याची गति वाढवते. ज्या प्रमाणे एखादे उत्प्रेरक, स्वत: प्रत्यक्ष क्रियेत भाग न घेता एखाद्या रासायनिक क्रियेची गति वाढवते त्याच प्रमाणे आपले सकारात्मक आणि प्रेरक चिंतन आपली ध्येयाच्या दिशेने चालण्याची गति वाढवते. प्रेरक आणि सकारात्मक चिंतनाने  आपला आत्मविश्वास बळावतो, आपला आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्णतेवर, आपण ठरविलेल्या  ध्येयाच्या पूर्णतेवर विश्वास दृढ होत जातो, आपल्याला मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करण्याचे बळ मिळते ज्यामुळे ध्येय-प्राप्ति अगदी सहज होते. म्हणून ध्येय-निर्धारण करतांना, ध्येयाच्या वाटेवर चालतांना आपले चिंतन प्रेरक आणि सकारात्मक असणे अतिशय गरजेचे आहे.

       पुढील अंकांपासून ध्येय-निर्धारण ( Goal Setting) या संकल्पनेला आणखी खोलात जाऊन समजून घेऊया.
 

       ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

      

Thursday, June 17, 2021

ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -२

                                         ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -२ 


                 ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

                 मागील अंकात आपण पाहिले की 'अपेक्षित परिणाम मिळविणे' अर्थात 'यशाचे शिखर गाठणे' हा एकमात्र अर्थ आपण 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या शब्दाचा घेतो पण 'यशाचे शिखर गाठण्यासाठी' या एकमात्र अर्था शिवाय अन्य आवश्यक ७ अटी पूर्ण करण्यासाठी कष्ट/ परिश्रम घेत नाही, म्हणून 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' मिळविणे कठीण किंवा अशक्य वाटू लागते व आपण ध्येयाची वाट सोडून देतो, परिणामी आपण ठरविलेले 'ध्येय' एक 'अपूर्ण इच्छा' बनून राहून जाते. पण आपण जर ध्येय ठरवितांना आणि ध्येयाच्या वाटेवर चालतांना मागील अंकात 'ध्येय' या संकल्पनेच्या सोप्या व्याख्येतील सात ही अटींचा विचार केल्यास 'ध्येय' गाठणे शक्य होते. आपल्याला संदर्भ लागावा म्हणून एकदा पुन्हा ती  व्याख्या खाली देत आहे-

"एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या  समूहाने  दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि  ठराविक समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन  म्हणजे 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' असते."

या व्याख्येतील पहिल्या तीन अटींवर आज विचार करूया -

पहिली अट आहे - ध्येय निर्धारण कोण करतो ? उत्तर आहे  'व्यक्ति' किंवा 'व्यक्तींचा समूह' ध्येय निर्धारण करतो. स्पष्ट आहे  एक व्यक्ति आपले स्वत: चे 'वैयक्तिक ध्येय' (Personnel Goal ) ठरवतो  आणि  व्यक्तींचा समूह मिळून आपल्या समूहाचे, आपल्या संघटनेचे 'संघटनात्मक ध्येय' (Organizational Goal) ठरवतात. म्हणून आपण आपले वैयक्तिक ध्येय ठरवीत आहोत की आपल्या समूहाचे, आपल्या संघटनेचे संघटनात्मक ध्येय ठरवीत आहोत याचा आधी विचार करणे गरजेचे आहे.

आपल्या स्वत:च्या क्षमता, आपले स्वत:चे ज्ञान, कौशल्य, आपला स्वभाव , आपली दुर्बल स्थाने, आपण पूर्वी मिळविलेले लहान-मोठे यश-अपयश,  आपल्या मार्गात आलेल्या अडचणी, त्या अडचणींना आपण कसे दूर केले,  या सर्वांचा विचार जर आपण 
वैयक्तिक ध्येय ठरविताना केला तर आपले ध्येय नक्की पूर्ण होईल. पण  याच सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या संघटनेचे संघटनात्मक ध्येय ठरविले, तर ते पूर्ण होणे शक्य नाही कारण आपण वैयक्तिक बाबींचा विचार करून समूहाचे ध्येय ठरविले होते. संघटनेचे ध्येय ठरवितांना संघटनेच्या प्रत्येक सदस्याच्या स्वभाव, ज्ञान, कौशल्ये, दुर्बल स्थाने, पूर्वीचे यश-अपयश, अडचणी  या सर्व बाबींचा व्यक्ति-सापेक्ष विचार करणे  गरजेचे आहे. आपण कुणाला गृहीत धरून त्याला जवाबदारी दिली तर तो व्यक्ति ती जवाबदारी चोख पार पाडेल  याची खात्री नाही. याउलट  संघटनेचे ध्येय ठरवितांना सर्वानी मिळून वरील सर्व अपेक्षित बाबींवर विचार करून, एकमत होऊन जर ध्येय ठरविले तर ते नक्की पूर्ण होईल. 


दुसरी अट आहे - ध्येय निर्धारण कसे करावे ? उत्तर आहे ध्येय निर्धारण दूरदृष्टीने करावे. दूरदृष्टीने म्हणजे ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक मैलाच्या दगडापर्यन्त आपली दृष्टी जाणे आवश्यक आहे, मार्गातील प्रत्येक पडावाचा विचार करणे गरजेचे आहे. यामुळे मार्गातील संभवित अडचणींचा विचार केला जातो आणि त्यांना दूर करण्याचा किंवा पर्यायी मार्गाचा आधीच विचार केला जातो. दूरदृष्टीने ध्येय-निर्धारण केल्यामुळे  मार्गातील अडचणी आपले किंवा आपल्या समूहातील कुणाचेही मनोबल, आत्मविश्वास कमी होऊ देत नाही उलट आधी पासून विचार केल्यामुळे अडचणींना मात कशी द्यावी किंवा पर्यायी मार्ग निवडणे हे आधी पासूनच ठरलेले असल्यामुळे मनोबल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो परिणामी ध्येयाच्या दिशेने आपली गति वाढते.

अगदी सोप्या उदाहरणाने या अटीला समजून घेऊया. आपण कार ने मुंबईहून नाशिक साठी निघतांना आपण फास्ट टेग रिचार्ज , मार्गात लागणारा ट्राफिक, अपेक्षित यात्रेची वेळ, पेट्रोल, चाकांमध्ये  हवेचा दाब, अतिरिक्त चाक या सर्व बाबींचा विचार करून निघतो. सायंकाळी ट्राफिक अधिक असतो म्हणून आपण रात्री ८ नंतर किंवा सकाळी ६ वाजता निघतो, एवढे करूनही जर कसारा  घाटावर ट्राफिक जाम असल्याचे कळले तर आपण आधीच पर्यायी मार्ग निवडून आपला वेळ आणि ताण  दोन्ही वाचवतो नं ? यालाच दूरदृष्टी म्हणतात. या उलट आपल्या कार मध्ये असलेले अतिरिक्त चाक पंचर किंवा खराब असेल, पेट्रोल कमी असेल  आणि आपण प्रवास सुरू करतांना याची दखल  नाही घेतली.  वाटेत आपल्या कारचे चाक पंचर झाले तर आपला प्रवास दूरदृष्टिपूर्ण नव्हता हे सिद्ध होते कारण आपण मार्गात येणाऱ्या सामान्य अडचणींचा देखील विचार केला नाही.  



तिसरी अट आहे - कोणत्या पद्धतीने ध्येय निर्धारण करावे ? उत्तर आहे सुनियोजित पद्धतीने ध्येय निर्धारण करावे. कुठल्याही प्रकल्पासाठी किंवा परियोजनेसाठी 'नियोजन' (Planning ) सर्वाधिक महत्वाचे आहे, आणि नियोजन जर उत्तमपणे झाले तर यश गाठणे अगदी सहज शक्य होते. नियोजन करतांना ध्येय-मार्गातील प्रत्येक टप्प्याचा विचार केला जातो, कोण, कधी, काय , कुठे, कसे, कशासाठी या सर्व प्रश्नांवर विचार करूनच ध्येय ठरवून ,  ध्येयाच्या दिशेने चालायला सुरुवात होते. यालाच उत्तम नियोजन म्हणतात. 

अगदी सोप्या उदाहरणाने या ही अटीला समजून घेऊया. समजा आपल्याला दिल्ली हून कन्याकुमारीला जायचे असले तर आपण कोण-कोण जाणार? कधी जाणार ? ट्रेन/फ्लाइट चे आरक्षण, सामानाची पॅकिंग, खर्चासाठी अपेक्षित रक्कम, रस्त्यात लागणारी शिदोरी, पाणी ईतर 
काय-काय अपेक्षित आहे ? आरक्षण कुठून होईल, खर्चासाठी पैसे कुठून आणायचे, प्रवासात लागणाऱ्या वस्तु कुठून आणायच्या ईतर सर्व कुठे मिळेल ? आरक्षण कसे होईल, स्टेशनवर/एअरपोर्ट वर कसे जाणार ईतर व्यवस्था कश्या होतील ?  कन्याकुमारीला कां  जायचे आहे ? ईतर सर्व बाबींचा विचार करूनच आपण दिल्लीहून कन्याकुमारीला जायचे नियोजन करतो. त्याचप्रमाणे आज जेथे आपण आहोत तेथून ध्येया पर्यन्त पोचण्यासाठी उत्तम नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे. असे म्हणतात की "Well Planned is Half Done" किंवा " Well  Begun is  Half Done" अर्थात उत्तम नियोजनामुळे  किंवा उत्तम सुरुवातीमुळे ध्येयाचा अर्धा टप्पा गाठला जातो. उत्तम सुरुवात ही केवळ उत्तम नियोजनामुळेच संभव होते.  


पुढील अंकात उर्वरित चार अटींवर विचार करूया. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 



Monday, June 14, 2021

ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -१

       ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -१ 


      ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

         'ध्येय' किंवा 'लक्ष्य' किंवा आंग्ल भाषेतील 'Goal' हे तीन ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत व त्यांचा सामान्य अर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण  यांच्या आपल्याला माहीत असलेल्या सामान्य अर्थापेक्षा या शब्दांना 'संकल्पना' या रूपांत पहायचे असले, समजून घ्यायचे असले तर आपल्याला खूप खोलांत  शिरून पहावे लागते. 

         'ध्येय' या संकल्पनेची अगदी सोप्या भाषेत  व्याख्या करावयाची असल्यास - "एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या  समूहाने  दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि  ठराविक समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन  म्हणजे 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' असते."

    वरील व्याख्ये वरुन असे ध्यानांत येते की  'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या संकल्पनेसाठी खालील ७ अटी आवश्यक आहे- 

                                    १.कुणी - एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने 

                                    २.कसे - दूरदृष्टी  ने 

                                    ३.कोणत्या पद्धतीने - सुनियोजितपणे / सुनियोजित पद्धती ने

                                    ४.कधी - ठराविक समय सीमेत 

                                    ५.कशासाठी - अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी,
                                                          यशाचे शिखर गाठण्यासाठी 
 
                                    ६.काय - चिंतन करणे, योजना आखणी, रणनीती ठरवणे,मार्गात
                                                  येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी विचार करणे 

                                    ७.वैशिष्ट्य - क्रियेसाठी किंवा कृतीसाठी प्रेरक ठरणारे चिंतन

              यात 'अपेक्षित परिणाम मिळविणे' अर्थात 'यशाचे शिखर गाठणे' हा एकमात्र अर्थ आपण 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या शब्दाचा घेतो पण 'यशाचे शिखर गाठण्यासाठी'  वर उल्लेख केलेल्या अन्य ६ अटी पूर्ण करण्यासाठी कष्ट/ परिश्रम घेत नाही, म्हणून 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' मिळविणे कठीण किंवा अशक्य वाटू लागते व आपण ध्येयाची वाट सोडून देतो, परिणामी आपण ठरविलेले 'ध्येय' एक 'अपूर्ण इच्छा' बनून राहून जाते. पण आपण जर ध्येय ठरवितांना आणि ध्येयाच्या वाटेवर चालतांना वरील सात ही अटींचा विचार केल्यास 'ध्येय' गाठणे शक्य होते. 

                पुढील भागापासून या अटींवर अधिक चिंतनाला प्रारंभ करूया. 

                ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥