।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सादर वंदन !
मागील अंकात आपण आपल्या वेळेच्या परिणामकारकपणे इष्टतम उपयोगासाठी (Optimum Utilization) आपली दैनंदिन कृती-योजना आखणी आणि आपल्या कामाला ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे यावर चिंतन केले. आपण बघितले की आपल्या कामांची यादी बनवून त्यांची विभागणी आजची कामे, आठवड्यात करायची कामे आणि महिनाभरांत करायची कामे या तीन भागांत केल्याने कामांचे प्राधान्यक्रम ठरविणे तर सोपे जातेच कुठलेही काम स्मृतीवर अवलंबून नसल्यामुळे विसरण्याची शक्यता राहत नाही आणि प्रत्येक काम पूर्ण होऊ लागते. कामांची यादी आणि विभागणी झाल्यावर त्या कामांना करण्यासाठी कृती-योजना (Action Plan) ठरवतांना प्रत्येक कामापासून आपल्याला मिळणारा अपेक्षित परिणाम आणि त्या कामासाठी लागणारी अनुमानित अवधी यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कारण या दोन्हीं मुळेच आपल्या मनात प्रत्येक कामाला वेळेवारी पूर्ण करण्याची ईच्छा जागृत होते आणि कुठलेही कार्य मनापासून करायला गेलो की त्यांत नक्कीच यश मिळते.
अनेकवेळा आपण कामांची यादी बनविली, त्याची योग्य विभागणी केली तरी काम सुरु कसे करावे हे आपल्याला कळत नाही किंवा काम सुरु करायची ईच्छाच मनांत जागृत होत नाही परिणामी कामांचा ढीग वाढत जातो आणि कुठून आणि कसे सुरु करावे हे समजत नाही आणि मनांत नैराश्य उत्पन्न होऊ लागते. अश्यावेळी खालील पद्धतीने काम करायचा प्रयत्न करायला हवा-
- सर्वप्रथम आपल्या कृती-योजनेतील प्राथमिकतेनुसार सर्वात महत्वाचे कार्य निवडावे आणि त्याच्या पुढे लिहिलेली कामाची अनुमानित अवधी आणि त्या कामाने होणारे अपेक्षित परिणाम यांना लक्षपूर्वक वाचावे. कामाची अनुमानित अवधी जर एक तासाहून अधिक असली तर त्या अवधीचे एक-एक तासाचे भाग करावे. उदाहरणार्थ एकाद्या कामाला लागणारा अनुमानित वेळ आपण दीड तास ठरविला आहे तर त्या कामाला आपण एक तास आणि अर्धा तास अश्या दोन टप्प्यात करायचे ठरवूया. अनुमानित अवधी जर दोन तासाहून अधिक असली तर एक-एक तासाच्या टप्प्यांमध्ये त्या कामाची विभागणी करावी.
- या नंतर एक तासाच्या अवधीला ४ भागांमध्ये वाटावे - पाच मिनिटे , पाच मिनिटे , पंचेचाळीस मिनिटे आणि पाच मिनिटे.
- पहिली पाच मिनिटे आपल्याला ते काम करण्यासाठी मानसिक तयारीसाठी द्यावी. ज्याप्रमाणे 'बी' पेरण्याआधी जमिनीची मशागत करावी लागते त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळो यासाठी आपल्याला ते काम करण्याची मानसिक तयारी करायला हवी जेणेकरून आपल्या मनांत काम करण्याची ईच्छा-शक्ती जागृत होईल. मानसिक तयारी कशी करावी ? पाच मिनिटे आपल्याला जे आवडत असेल ते करावे उदाहरणार्थ एखादे गाणे ऐकावे, एखादा जोक आठवावा, एखादा मजेदार व्हिडीओ पाहावा , एखाद्या आवडत्या मित्राशी किंवा व्यक्तीशी फोनवर गोष्टी कराव्या. जे केल्याने आपला मूड 'फ्रेश' होईल असे काही तरी करावे पण वेळेची मर्यादा ध्यानांत ठेवून केवळ ५ मिनिटेच आपल्या मूड ला 'फ्रेश' करण्यासाठी द्यावीत. आवडत्या छंदात अडकल्याने आपले काम एकीकडे राहून जाईल.
- मूड 'फ्रेश' झाल्यानंतर पुढील पाच मिनिटात आपले लक्ष वेधणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्यापासून दूर करावे. उदाहरणार्थ इंटरनेट, मोबाईल, टीव्ही, फोन , फेसबुक, ट्वीटर, whats app, मेल या सर्व आपली शांतता भंग करणाऱ्या आपले ध्यान-भंग करणाऱ्या प्रत्येक वस्तू पासून स्वत:ला मुक्त करून घ्यावे, जेणेकरून आपले लक्ष्य केवळ आपल्या कामावर केंद्रित करणे सोपे जाईल. दीर्घ श्वसन अथवा कपालभाती द्वारे या सर्वांपासून स्वत:ला मुक्त करून घेणे व कामावर ध्यान केंद्रित करणे सोपे जाते.
- पुढील पंचेचाळीस मिनिटे केवळ आपल्या कामावर केंद्रित करावी. एकावेळी एकच काम हातात घ्यावे, मधून कितीही महत्वपूर्ण काम आठवले तरी ते करण्यासाठी प्रवृत्त होऊ नये , ते काम एका डायरीत लिहून घ्यावे आणि आपण करीत असलेल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करावे. लक्ष केंद्रित करण्यासाठी जर आपल्या कानाला हेडफोन लावून अगदी कमी आवाजात वाद्य संगीत एकले तर ते आपली एकाग्रता वाढविण्यास फार उपयोगी सिद्ध होते पण ध्यानांत ठेवावे की संगीत अगदी कमी आवाजात वाजवावे. असे केल्याने आपल्या कामाची गती वाढते आणि अपेक्षित परिणाम मिळणे आणखी सोपे होते.
- कामाची अनुमानित अवधी तास भर असल्यास ते काम पंचेचाळीस मिनिटात नक्की पूर्ण होईल. अनुमानित अवधी एक तासाहून अधिक असल्यास पंचेचाळीस मिनिटे सतत काम केल्यानंतर पाच मिनीटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती घेण्यासाठी आपल्या सभोवतीच्या वातावरणांत परिवर्तन आणायला हवे, यासाठी आपल्या कामाच्या जागेवरून उठून दुसरीकडे जावे. अश्याने आपल्याला त्या कामाच्या तणावापासून मुक्त होणे शक्य होते. काम पूर्ण झाले तरी काम बरोबर झाले की नाही, आपण योग्यरित्या काम केले की नाही, आपला बॉस कामाने संतुष्ट होईल की नाही असे बरेच प्रश्न मनांत उद्भवतांत ज्यामुळे आपल्यावर मानसिक ताण पडतो. तणावाचा प्रतिकूल परिणाम पुढील कामांवर होऊ नये म्हणून स्वत:ला कामाच्या तणावापासून मुक्त करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या वातावरणांत बदल करून घ्यावा, जागेवरून उठून अन्यत्र जावे आणि थोडे पाणी प्यावे. सतत काम केल्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते, आपले उर्जा-स्तर कमी होते , ते पुन्हा मिळवून घेण्यासाठी पाणी अथवा एखादे पेय प्राशन करावे आणि पुढील कामासाठी तयार व्हावे.
- कामाची अनुमानित अवधी एक तासाहून अधिक असली तर तास भरानंतर वरील प्रक्रिया पुन्हा दोहरवावी.
अश्याप्रकारे वरील प्रयोग करून बघावा, काम करणे सोपे आणि आनंददायक तर वाटेलच , सर्व कामे निश्चित वेळात पूर्ण देखील होतील.
वेळ-व्यवस्थापनाच्या या श्रुंखलेला येथेच विराम देत आहे. लवकरच पुढील विषयाला सुरुवात करूया. वेळ-व्यवस्थापना विषयी काही शंका किंवा एखादा पैलू सुटलेला वाटत असल्यास अवश्य कळवावे, समाधान शोधण्याचा आपण नक्की प्रयत्न करू.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
No comments:
Post a Comment